राज्यातील सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन आणि मानांकन अनिवार्य ; अन्यथा प्रवेश प्रक्रिया रद्द होणार
राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून सूचना
========================
मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना नॅक (NAAC) मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन तसेच मानांकन करणे गरजेचं असल्याच्या सूचना राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. जर या विद्यालयांनी असे न केल्यास संबंधित महाविद्यालयांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही असे जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील तब्बल 60 टक्के महाविद्यालयांचे नॅक (NAAC) मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन झाले नसल्यामुळे हा आदेश देण्यात आला आहे.
राज्यातील नॅक (NAAC) मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत दिली आहे. जर मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांनी 31 मार्च पर्यंत हे करून नाही घेतले तर येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही अशा स्पष्ट सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे या दृष्टिकोनातून या सर्व प्रक्रिया महाविद्यालयांनी पार पाडणे आवश्यक आहे असे या आदेशात म्हंटले आहे. राज्यातील विनाअनुदानित 2141 महाविद्यालयांपैकी केवळ 138 महाविद्यालयांचे मूल्यांकन पुनर्मूल्यांकन पूर्ण झाले आहे. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेत हे निर्देश दिले आहेत.
=========================
Comments
Post a Comment