किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांचे आवाहन - शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांचे लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्कच्या माध्यमातून जाहीर आवाहन

=========================

(कै.साहेबराव करपे व मालतीताई करपे यांचा दुर्मिळ फोटो.)


शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे येत आहेत. याही वर्षी कमी झालेल्या नाहीत. जे आत्महत्या करतात त्यांचे आकडे येतात पण जे रोजच 'मरण' जगतात त्यांचे काय..? विधानसभा आणि लोकसभेची अधिवेशने झाली. त्यात कोणी साधे दुःख व्यक्त केले नाही. राजकीय स्तरावर क्रूर कोडगेपणा पसरला आहे. मीडिया नको त्या गोष्टीवर चर्चा करून शेतकऱ्यांचा आक्रोश दाबून टाकण्यात हातभार लावत आहे. अशा परिस्थितीतून देश जात आहे. आपण काही करू शकतो का..? याचा विचार करून आम्ही ठरवले आहे की, 19 मार्च रोजी आपण सगळे शेतकरी सहवेदनेसाठी एक दिवसाचा उपवास करू.


19 मार्च का..? :-

19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (ता.महागाव, जि.यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी, पत्नी व चार मुलांसह आत्महत्या केली होती. ही शेतकर्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. 2017 पासून महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील व विदेशातील लाखो सुहृदयी लोक दरवर्षी 19 मार्चला उपवास करतात. यावर्षी आपण त्यात सहभागी होऊ या.


सहवेदना :-

अन्न हा जीवाचा मूलाधार आहे. अन्न निर्माण करता आले म्हणून माणूस प्रगती करू शकला. शेतकरी अन्न पिकवतो. तो सर्जक आहे. त्याच्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे. खरे तर शेतकरी आत्महत्या ही 'राष्ट्रीय आपत्ती' मानली पाहिजे. दुर्दैवाने या गंभीर बाबीकडे कोणाचे फारसे लक्ष नाही.

शेतकरी आत्महत्या थांबाव्यात या साठी मी काय करू शकतो..? आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात सत्ता नाही. शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू आदी) नरभक्षी कायदे रद्द करण्याचा अधिकार नाही. आपण शस्त्र घेऊन लढू शकत नाही. करोडो शेतकाऱ्याना आर्थिक मदत देण्याऐवढी पुंजीही आपल्या जवळ नाही. आपण सामान्य माणसे, सहवेदना व्यक्त करू शकतो. शेतकऱ्यांना 'आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' हा दिलासा देऊ शकतो. तो दिलासा देण्यासाठी व सहवेदना व्यक्त करण्यासाठी 19 मार्च रोजी आपल्याला उपवास करायचा आहे. आत्मक्लेशाचा हा मार्ग या देशात अनेकदा वापरला गेला आहे. त्यातून अपेक्षित परिणाम आले आहेत. तोच प्रयत्न आपण करायचा आहे..!


उपवास आणि उपोषण :-

हा उपवास उत्स्फूर्तपणे, आपल्या मनाशी निर्धार करून करायचा आहे. 

आपण आपले नित्याचे काम करीत उपवास करू शकतो. खूप केले देवा - नवसाची उपवास, आता एक उपवास शेतकऱ्यांसाठी..! याला आपण वैयक्तिक उपवास म्हणू. सार्वजनिक ठिकाणी बसणे, म्हणजे उपोषण करणे, तुम्हाला जे सोयीचे वाटेल त्या पद्धतीने उपवास किंवा उपोषण करू शकता.


अन्नत्याग का..? :-


१) साहेबराव करपे कुटुंबीय व आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांचे स्मरण करणे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे., २) शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करणे., ३) शेतकऱ्यांप्रती आपली बांधिलकी बळकट करणे., ४) शेतकऱयांच्या आत्महत्यांसाठी कारणीभूत असलेल्या कारणांचा विचार करून ते कारण दूर करण्याचा प्रयत्न करणे., ५) शेतकरी स्वातंत्र्यासाठी संकल्प करणे.


19 मार्चचा उपवास :-


पहिल्या वर्षी (2017) साहेबराव करपे यांचे गाव चिल-गव्हाण (यवतमाळ) येथे उपवास सुरू करून महागाव येथे उपोषणाला बसलो. या वर्षी लाखो लोकांनी देश-विदेशात वैयक्तिक  उपवास केला., दुसऱ्या वर्षी (2018) साहेबराव करपे कुटुंबियांनी जेथे आत्महत्या केली, त्या दत्तपुरला (जि. वर्धा) भेट देऊन पवनार येथे उपोषण केले., तिसऱ्या वर्षी (2019) दिल्लीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधी (राजघाट) परिसरात उपवास केला., चौथ्या वर्षी (2020) मी व माझ्या अनेक किसानपुत्र मित्रांनी पुण्यात उपवास केला., सहाव्या वर्षी (2021) पहिली पदयात्रा निघाली. औंढा ते चिलगव्हाण. चिलगव्हाण येथे मशाल पेटवून उपवासाची सांगता करण्यात आली., सहाव्या वर्षी (2022) अंबाजोगाई (जि.बीड) येथे सामूहिक उपवास केला. या वर्षी पानगाव ते आंबाजोगाई अशी पदयात्रा काढण्यात आली. यावर्षी (वर्ष 7 वे 2023) खान्देशातील धुळे येथे उपोषण करणार आहोत. किनगाव (जळगाव) ते धुळे अशी पदयात्रा निघणार आहे. अमरावती जिल्ह्यात देखिल ही पदयात्रा निघणार आहे. महाराष्ट्रातील लाखो स्त्री-पुरूष हे दरवर्षी 19 मार्चला उपवास करतात. अनेक जिल्ह्यातील कित्येक गावात सामूहिक उपवास केला जातो. देशात विविध राज्यातील किसानपुत्र वैयक्तिक उपवास करतात. विदेशात गेलेले किसानपुत्र देखील उपवास करतात.


शिस्त :-

१) हे उपोषण कोण्या एका संघटनेचे किंवा कोण्या एका राजकीय पक्षाचे नाही. ज्यांना शेतकऱ्यांबद्दल बांधिलकी वाटते, त्या सर्वानी एकत्र येऊन करणे चांगले. अशा स्थितीत आपले सर्व अभिनिवेश बाजूला ठेवावे.,

२) एकत्र न येता ही आपण आपल्या बॅनर खाली उपोषण करू शकता. एवढेच नव्हे तर एकट्याने सुद्धा उपवास करू शकता. उपवास करायला कोणावर ही बंदी नाही.,

३) या उपोषणाच्या निमित्ताने कोणताही वाद उपस्थित होणार नाही याची काळजी घ्यावी. एका अत्यंत गंभीर विषयावरील हे उपोषण होत आहे, त्याचे तेवढे गांभीर्य कायम ठेवावे.


विशेष सूचना :-

1) हे उपोषण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत करता येईल. सार्वजनिक उपोषण 10 ते 5 या वेळेतही करता येईल.,

2) डायबेटीज किंवा अन्य रूग्ण वा वृद्ध व्यक्तीने आपल्याला झेपेल एवढ्याच वेळेपुरते उपोषण करावे.,

3) विद्यार्थ्यांनी व लहान मुलांनी दोन मिनिटे मौन पाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱयांचे स्मरण करावे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने होत आल्या आहेत. दरवर्षी हजारो आत्महत्या होत आहेत. खरे तर, या सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या हत्या आहेत. आपल्या अवती भोवती वणवा पेटला आहे. तो विझविण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. सर्जकांना स्वतंत्रपणे, सुखाने व सन्मानाने जगता यावे यासाठी ही धडपड आहे. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने त्यात सहभागी व्हावे..! ही काळाची गरज आहे.



●●●

अमर (काका) हबीब,

मुक्त पञकार आणि 

किसानपुञ आंदोलनाचे प्रणेते,

अंबाजोगाई

संपर्क : +918411909909


=======================


Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड