अंबाजोगाईचे प्रख्यात कवी दिनकर जोशी भूषविणार पाचवे एकता मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

26 व 27 डिसेंबर रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन

=======================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

एकता फाउंडेशन शिरूर कासार (जि.बीड) आणि शांतीवन, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अंबाजोगाईचे प्रख्यात कवी दिनकर जोशी हे भूषविणार आहेत. 26 व 27 डिसेंबर रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.


पुन्हा एकदा अंबानगरीचा नांवलौकिक व अंबाजोगाईतील साहित्य रसिकांचा आनंद द्विगुणित होईल अशी महत्त्वपूर्ण घटना साहित्य क्षेत्रात पुढील आठवड्यात घडून येणार आहे. ते म्हणजे अंबाजोगाईचे प्रख्यात साहित्यिक व कवि दिनकर जोशी हे 26 व 27 डिसेंबर 2022 रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते दिपक नागरगोजे हे आहेत. या संमेलनात श्रध्देय बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार व स्व.विजयकुमार ठाकूर जीवनगौरव पुरस्कार वितरण करण्यात येईल. तसेच राज्यस्तरीय पुरस्कार आणि राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण करण्यात येतील. व्यंगचित्रकार सुहास पालिमकर, व्यंगचित्रकार दिपक महाले यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्राची लोकधारा, लेखक आपल्या भेटीला, मुलाखत, परिसंवाद, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन, पुस्तक प्रकाशन, सन्मान भुमिपुञांचा, समारोप (ठराव वाचन) आदी विविध विषयांवर या साहित्य संमेलनात मौलिक चिंतन होणार आहे.


संमेलनाध्यक्ष दिनकर जोशी यांचा परीचय :



साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिनकर वासुदेवराव जोशी हे मागील 30 वर्षांपासून  काव्यलेखन करीत आहेत. त्यांना आद्यकवि मुकुंदराज काव्यरत्न पुरस्कार, कै.सुभद्राबाई बिवरे यासह विविध पुरस्कार प्राप्त असून त्यांनी सासवड आणि उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जागतिक मराठी संमेलन, पुणे फेस्टिव्हल येथे सलग पाच वर्षे आणि मराठवाडा साहित्य संमेलनासह महाराष्ट्रातील विविध संमेलनातून सहभागी होत काव्यगायन करून सतत 15 वर्षांपासून अंबानगरीचा नांवलौकिक वाढविला आहे. त्यांचा "आयुष्याचे अवघड ओझे" हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन (1995), मायबोली साहित्य संमेलन, सद्भावना सांस्कृतिक समारोह, अंबाजोगाई साहित्य संमेलन, बालझुंब्बड आदींचे यशस्वी आयोजन, संयोजन, संकल्पना, सहभाग व मार्गदर्शन करून अंबाजोगाईसह मराठवाड्यातील साहित्य चळवळीला बळ, प्रेरणा आणि नवा आयाम देण्याचे कार्य दिनकर जोशी हे आजपावेतो करीत आहेत. विविध सामाजिक व साहित्य संस्थांचे ते पदाधिकारी ही आहेत. सामाजिक बांधिलकीतून अंबाजोगाई शहरात विविध साहित्यिक उपक्रम राबवून मराठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर कविंना सन्मानित करण्यात जोशी यांचा मोठा पुढाकार राहिला आहे. दिनकर जोशी हे योगेश्वरी शिक्षण संस्थेत सहशिक्षक आहेत. शिक्षण तसेच साहित्यासोबतच त्यांनी 25 वर्षे पञकारीता केली आहे. त्यांना कै.अनंतराव भालेराव शोध पञकारीता पुरस्कार, भिकाभाऊ राखे आदर्श पञकारीता पुरस्कार व कै.सा.ऊ.भारजकर शोध पञकारीता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एकता फाउंडेशन शिरूर कासार (जि.बीड) आणि शांतीवन, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने 26 व 27 डिसेंबर रोजी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अंबाजोगाईचे प्रख्यात कवी दिनकर जोशी हे भूषविणार आहेत. त्याबद्दल जोशी यांच्या निवडीचे साहित्य वर्तुळ, मिञ परीवार तसेच सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.


========================

Comments

  1. आपण संमेलनाध्यक्ष म्हणून सन्मानीत होत आहात,याचा मनापासून आनंद आहे. खूप खूप अभिनंदन, मित्रवर्य👌💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)