लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का..? - यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उदघाटनात विश्वास पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न
=========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का असा प्रश्न प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती चव्हाण समारोहाच्या उदघाटनीय कार्यक्रमात उपस्थित केला. यावेळी विचारमंचावर स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे मान्यवर उपस्थित होते.
अंबाजोगाई येथे मागील ३८ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उद्घाटन कार्यक्रमात पाटील हे बोलत होते. आपल्या विस्तारीत भाषणात विश्वास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उदघाटकीय भाषणाची सुरूवात करताना या समारंभाचे कौतुक करीत असा समारोह पश्चिम महाराष्ट्रात कोठे ही होत नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या नावावर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांच्या चिमणीतून मोठा धूर निघतो. मात्र यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जागविण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रात होत नाही याची खंत व्यक्त केली. आपल्या भाषणात विश्वास पाटील यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करीत असताना लोकनेते चव्हाण यांच्या अनेक निर्णयांची त्यांनी यावेळी आठवण करून दिली. लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी घेतलेले अनेक निर्णय राज्यातील सामान्य माणसांना न्याय देणारे घेतले. १९७६ साली धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी अंमलात आणला. आज या कायद्याची संपूर्ण भारतात अंमलबजावणी होत आहे. लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का..? असा प्रश्न अलिकडे आपल्याला पडत आहे. ज्या सामान्य माणसाच्या कल्याणासाठी यशवंतराव चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले त्याच सामान्य लोकांना आज आपल्या न्याय हक्कांसाठी भांडावे लागत आहे. आज विद्यार्थी संख्येच्या आधारावर शाळा बंद करण्याच्या निर्णयावर देखिल त्यांनी टीका केली. २० विद्यार्थी संख्या असेल तर शाळा चालू अन्यथा बंद करण्याचा निर्णय चुकीचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. विश्वास पाटील यांनी आपल्या विस्तारीत भाषणात त्यांनी लिहिलेल्या अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या मधील घटना आणि पात्रांची माहिती दिली. व अनेक ऐतिहासिक संदर्भ ही कथन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात समारोह स्मृती समितीचे सचिव दगडू दादा लोमटे यांनी मागील ३७ वर्षे घेण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमातून लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जागर सुरू असल्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानाचा जागर करण्यासाठी हा समारोह आयोजित करण्यात येतो असे सांगितले. लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य, संगीत, सांस्कृती आणि राजकारण या क्षेत्रात घालून दिलेला मापदंड आज ही कायम व आदर्शवादी आहे. त्यांच्या विचारांचा हा जागर कायम ठेवण्यासाठी हा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह साजरा करण्यात येतो. या ३८ व्या समारोहाचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात येत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होतो आहे. विश्वास पाटील यांच्या सारखा सिद्धहस्त लेखकाच्या आणि एका वरीष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या हस्ते हे उद्घाटन होणे ही आनंदाची बाब असल्याचे दगडू दादा लोमटे यांनी सांगितले. यावेळी विश्वास पाटील यांचा परिचय अमृत महाजन यांनी करून दिला.
२६ नोव्हेंबरचे कार्यक्रम :
आज शनिवार,दि.
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरूवात सकाळी १० वा. बालआनंद मेळावा आयोजित केला असून सुप्रसिद्ध बालसहित्यकार प्रा.विनय आर.आर. (पुणे) हे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील व शालेय चित्रकला स्पर्धेचे विजेते यांना परितोषिके प्रदान करतील. पाहुणे म्हणून जागतिक कीर्तीचे शिल्पकार प्रदीप जोगदंड व रजनी वर्मा असतील. यावेळी सेलू येथील शिक्षक युवराज माने गुरुजी यांच्या 'गुरूजी, तु मला आवडतोस' या बाल साहित्य असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल. यावर्षी महाविद्यालयीन परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शालेय चित्रकला स्पर्धा त्या-त्या शाळेत घेतल्या जात आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. सायं. ७.३० वा. सुगम संगीताचे आयोजन केले आहे. औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध गायक राजेश सरकटे यांनी संगीतबद्ध केलेला 'मराठवाड्याचे काव्य वैभव' ही संगीत रजनी सादर करतील. त्यात राजेश सरकटे, पायल सरकटे आणि संगीता भावसार हे गीत सादर करतील. प्रा.समाधान इंगळे हे निवेदक असतील. साथसंगत - किबोर्ड - राजेश देहाडे, तबला - जगदीश व्यवहारे, ऑक्टोपॅड- राजेश भावसार, गिटार - संकेत देहाडे, ढोलक ढोलकी- अंकुश बोर्डे, मनोज गुरव - बासरी अशी असेल. अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीकडून देण्यात आली आहे.
=========================
Comments
Post a Comment